मंचर प्रतिनिधी
शेतीमालाच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. धना, मेथी, टोमॅटो, शेपू आदी भाजीपाला पिकांना सध्या अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेतकरी महेंद्र वाळुंज यांनी सांगितले की, भाजीपाला पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत व खर्च करावा लागतो. मात्र बाजारात मालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाऐवजी तोटाच पडत आहे. त्यामुळे बाजारभावातील घसरणीचा मोठा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खते, कीटकनाशके, औषधे, बी-बियाणे तसेच शेतीसाठी लागणाऱ्या अन्य निविष्ठांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेषतः खतांच्या किमती गगनाला भिडल्याने शेतीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे.
युवा प्रगतिशील शेतकरी जयेश वाळुंज यांनी सांगितले की, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळवून देण्याबरोबरच वाढत्या कृषी निविष्ठांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.





