spot_img
spot_img
spot_img

धामणी – पहाडदरा परिसरातील शेतकऱ्यांचा वीज कनेक्शनसाठी २२ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

 

मंचर प्रतिनिधी 

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी, पहाडदरा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत नऊ शेतकरी गट स्थापन करून डिंभेच्या उजव्या कालव्यावरून एकूण 9 उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाणी परवाना काढला. बँका आणि अन्य माध्यमातून कर्ज काढून प्रत्यक्ष पाईपलाईन देखील 21 मे 2025 मध्ये पूर्ण केली आहे. पाईपलाईन आणि वीज पंप बसवून संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाला आहे.या कामाला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे.

शेतीपंपासाठी  वीज कनेक्शन देण्या संदर्भात राज्य सरकारने सोलर धोरण आणले आहे. सोलर प्रकल्प राबवून वीज पंप चालवण्या संदर्भात शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी आहेत. सोलर पंप आणि संपूर्ण युनिट बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडे कुठलीही जागा नाही. पाटबंधारे विभागाकडून सोलर प्रकल्पासाठी जागा देण्यास चौकशी केली असता त्यांनी नकार दिल्याचे समजत आहे.

काही महिन्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर महावितरण आणि एका खाजगी कंपनी मार्फत एक सोलर पंप प्रकल्प राबवून एक योजना सुरू केली. सोलर पंपावरील उपसा सिंचन योजना ही पूर्णपणे अपयशी ठरली. या योजनेतून अपेक्षित पाणी मिळत नाही. प्रति मिनिट 1100 लिटर ज्याप्रमाणे आउटलेट मिळणे आवश्यक आहे. सोलर पंपाद्वारे प्रत्यक्षात प्रति मिनिट 300 लिटर पाणी मिळाले त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला नाही. या संदर्भात महावितरण कडून सविस्तर अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे असे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले आहे

शेतकऱ्यांनी समूह करून नऊ उपसा सिंचन योजना प्रकल्प राबवले आहेत. प्रत्येक योजने 20 ते 30 शेतकरी एकत्र आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला आठवड्यातील तीन ते चार तास असा हिस्सा आलेला आहे. सोलर प्रकल्पाचा विचार करता हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरल्याने तसेच यंदाच्या उन्हाळ्यात अति तीव्र होऊन असताना देखील चार ते पाच तासांपेक्षा अधिक हा पंप चालत नाही. ढग आल्यानंतर तो बंद पडतो. अपेक्षित पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.

वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंबहुना घरातले दाग दागिने गहाण ठेवून या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना राबवली. या योजनेला पूर्वीप्रमाणे वीज कनेक्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांनी विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी असा शेरा शेतकऱ्यांच्या अर्जावर दिला. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न होता पुन्हा सोलरचाच विषय महावितरण कडून शेतकऱ्यांवर लादला जात आहे.

आत्तापर्यंत अनेक वेळा लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या भेटींमध्ये लोकप्रतिनिधींनी डी पी सी अथवा अन्य संस्थांमधुन मोफत विजेची डीपी देण्याचे देखील मान्य केले होते. त्यानंतर महावितरण चे संचालक तसेच कार्यकारी अभियंता यांना देखील निवेदन दिले. मात्र अद्यापही वीज कनेक्शन देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून देण्याचे आदेश देऊन देखील शेती पपांना वीज कनेक्शन दिले नाही.

राज्य विधिमंडळाच्या मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनामध्ये धामणी येथील उपसा सिंचन योजनेला वीज कनेक्शन देण्यासंदर्भात आमदार दिलीप वळसे पाटील यांनी  मुद्दा उपस्थित केला होता   त्यावेळी मुख्यमंत्री यांनी वीज कनेक्शन देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले होते.

आता 22 जून 2026 पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे तरी देखील या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे धामणी येथील नऊ उपसा सिंचन योजनेचे शेतकरी विजेचे कनेक्शन नसल्याने पाण्यापासून वंचित आहेत. शेतीसाठी पाणी नाही. पिण्यासाठी टँकर चालू आहे. एकूणच धामणी परिसरातील शेतकरी हा दुष्काळ पाणीटंचाई आणि कर्जबाजारी झाल्याने होरपळला आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन तसेच खाजगी उसनवारी द्वारे उपसा सिंचन योजनेचा एकत्रित खर्च केलेला आहे. गेल्या वर्षभरापासून वीज पुरवठ्याअभावी हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून कोट्यावधी रुपयांचे कर्जाचे व्याज देखील भरावे लागत आहे. भविष्यात त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

धामणी परिसरातील शेती पंपांना वीज कनेक्शन मिळत नसल्याने यापूर्वी आंदोलन केले होते. त्यावेळी देखील वीज कनेक्शन देण्याची आश्वासन देण्यात आली प्रत्यक्षात त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

त्यामुळे यंदाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून धामणीचे माजी सरपंच सागर जाधव व १० शेतकरी हे सोमवार दिनांक 22 जून पासून धामणी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. उपसा सिंचन योजना बाधित शेतकरी आणि धामणी, पहाडदरा या गावातील शेतकरी धामणीच्या पंचाच्या पारावर आमरण उपोषणाला बसणार आहेत असे माजी सरपंच सागर जाधव यांनी सांगितले

Related Articles

ताज्या बातम्या