मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी संयुक्तपणे महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक २६ जानेवारी २०२६ पासून गावाच्या हद्दीत बाहेरील फिरत्या फेरीवाल्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार भाजीपाला, फळे, कपडे, प्लास्टिक वस्तू, भंगार इत्यादी वस्तू विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करून कोणी फेरीवाला गावात आढळल्यास त्याचा माल जप्त करण्यात येईल, तसेच ५०० रुपये दंड आकारण्यात येईल आणि आवश्यक ती पोलीस कारवाई केली जाईल.
ग्रामपंचायत पोंदेवाडी व ग्रामस्थांनी गावातील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी बाहेरील अनोळखी फेरीवाल्यांकडून कोणतीही खरेदी करू नये.
चौकट:
पोंदेवाडी परिसरात अलीकडे लहान-मोठ्या चोरीच्या घटना वाढल्या असून त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनांना आळा बसावा आणि नागरिकांमधील भीती दूर व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे माजी सरपंच अनिल वाळुंज यांनी सांगितले.





