मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यात उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक गावांमध्ये तापमान ३७ अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. शुक्रवार (दि. २४) रोजी ३७ अंशांची नोंद झाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून एप्रिल महिन्यात उष्णतेचा कडाका अधिकच जाणवू लागला आहे.
यावर्षी हिवाळ्यात थंडी विशेष जाणवली नाही; मात्र उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या जिरायती भागात उन्हाचा कडाका अधिक तीव्र असून नागरिकांना दिवसभर कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे.
उष्णतेची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील रस्ते ओस पडू लागले आहेत. शहरातील रस्त्यांवरही दुपारच्या सुमारास गर्दी कमी दिसत आहे. परिणामी, शीतपेयांना मागणी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.





