मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथे आषाढी एकादशीच्या निमित्त आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भाविकांनी जारकरवाडी येथील खिंडीत वसलेल्या संत ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दिवसभर “विठ्ठल विठ्ठल” नामघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
आषाढी एकादशीला पंढरपूर येथे लाखो भाविकांची यात्रा भरत असली, तरी विविध कारणांमुळे अनेकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा भाविकांनी आपल्या परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच संत ज्ञानेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.
यावेळी मंदिर समिती व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने भाविकांसाठी फराळ व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
जारकरवाडी येथील खिंडीत वसलेले संत ज्ञानेश्वर मंदिर निसर्गरम्य वातावरणामुळे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. हिरवाईने नटलेल्या परिसरामुळे वर्षभर येथे भाविक व पर्यटकांची रेलचेल असते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या परिसरात दिवसभर भक्तांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.





