मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी परिसरात शुक्रवार (दि. २६) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून शेतीला अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे, शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करावी अशी मागणी जारकरवाडी उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली आहे
तसेच गावातील व परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्त्यांनाही तळ्याचे स्वरूप आले होते. गावातील ढोबळेवाडी येथील शेतकरी विलास पाचपुते यांच्या घरात पावसाचे पाणी शिरले या पाण्यामुळे घरातील साहित्य व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
पोटचारीला वाढलेली झाडे झुडपे पाण्यासाठी अडथळा ठरत आहे त्यामुळे पोटचारीतील पाणी उन्मळून चारीच्या बाहेर आले व घरात शिरल्याचे विलास पाचपुते यांनी सांगितले. जलसंपदा विभागाने सदर पोटचारीची साफसफाई करावी अशी मागणी विलास पाचपुते यांनी केली आहे
यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी पूर्व आंबेगावातील अनेक गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
एकीकडे पावसाच्या कमतरतेचे संकट तर दुसरीकडे झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान, अशा दुहेरी संकटाचा सामना या परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.





