मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी ( ता . आंबेगाव ) येथील गावात मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांनी महावितरणच्या संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यांशी अनेकदा संपर्क साधला. मात्र, संबंधित कर्मचारी योग्य सहकार्य करत नसल्याचे माजी उपसरपंच महेंद्र पोखरकर यांनी सांगितले
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने वीजेची आवश्यकता भासत आहे मात्र दुरुस्तीच्या कामात विलंब होत असल्याचे दिसून येत आहे
मात्र, तीन दिवसांपासून वीज नसल्याने नागरिकांचे हाल होत असून पाणीपुरवठा, घरगुती कामे तसेच शेतकऱ्यांचीही गैरसोय वाढली आहे.
ग्रामस्थांनी या समस्येबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला असून तात्काळ वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





