मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील जारकरवाडी–लोणी रस्त्यावर भोजणदरा परिसरात मुख्य रस्त्यालगत एक धोकादायक विहीर असून, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मंचर–जारकरवाडी–लोणी हा रस्ता वाहतुकीसाठी सोयीस्कर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्ता आणि विहिरीची उंची समान असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा रस्ता रांजणगाव सणसवाडी औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठीही महत्त्वाचा असून, काही वर्षांपूर्वी या मार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे येथे वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने धोका अधिक वाढला आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून विहिरीभोवती उंच कठडे, संरक्षणात्मक भिंत, झाकण किंवा जाळी बसवावी, तसेच रात्रीच्या वेळी परावर्तक फलक किंवा प्रकाशयोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.





