मंचर (प्रतिनिधी) : युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रांजणी ता आंबेगाव जिल्हा पुणे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शनिवार, दि. 21 मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत श्री लक्ष्मीनरसिंह मंदिर प्रांगणात पार पडणार आहे.
या मेळाव्यात बारावी पास, आयटीआय, बी.ए., बी.एस्सी., बी.कॉम तसेच डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. तसेच NATS आणि NAPS योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
उमेदवारांचे वय किमान २० ते कमाल २५ वर्षे असणे आवश्यक असून २०२१ ते २०२४ दरम्यान उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.
निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीत मोफत जेवण व राहण्याची सुविधा देण्यात येणार असून एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी असणार आहे. NEEM/NTTF ट्रेनी पास उमेदवारांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.
मेळाव्यास येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे जसे की शैक्षणिक गुणपत्रिका, शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पाच पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे बंधनकारक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथे नोकरीची संधी मिळणार आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते होणार असून पंचायत समिती सदस्या प्रियांका केतन वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केतन वाघ यांनी केले आहे.





