मंचर प्रतिनिधी
पूर्व आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण झाले होते. उन्हाच्या तीव्र उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
तालुक्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार होऊन काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाला, मका, तसेच इतर उन्हाळी पिके करपत असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली
अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक बनले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामानातील बदलामुळे आगामी काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.





