spot_img
spot_img
spot_img

केबल चोरीने काठापूरातील शेतकरी त्रस्त

मंचर प्रतिनिधी 

काठापुर बुद्रुक ( तालुका आंबेगाव ) येथील   घोड नदीच्या काठावर असणाऱ्या 25 विद्युत पंपांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.ऐन उन्हाळ्यात शेती पिकांना पाण्याची गरज असताना केबल चोरीला गेल्याने तसेच शेतीमालांना बाजारभाव नसताना आर्थिक अडचणीत नवीन केबल कशी खरेदी करायची या विवंचनेत शेतकरी आहे. या चोरांचा बंदोबस्त कसा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापुर बुद्रुक या ठिकाणी घोड नदीवर कोल्हापूर पद्धतीचा तालुक्यातील सर्वात मोठा बंधारा आहे.या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठत असल्याने या ठिकाणावरून उजव्या काठावरुन काठापुर बुद्रुक लाखनगाव पोंदेवाडी पारगाव या गावांतील शेतकरी शेतीसाठी पाणी उससा करतात.सध्या या ठिकाणी जवळपास 85 विद्युत पंप एकाच ठिकाणावर आहेत.या ठिकाणी असणारे विद्युत पंपांच्या मोटरच्या खोकल्यापासून तर मोटर पर्यंत असणाऱ्या केबल चोरीला गेल्या आहेत.

जवळपास 25 शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. या ठिकाणी शेतकरी कुंडलिक भाऊ जोरी,संतोष नाथा शेटे ,सखाराम दिनकर ढमाले,देवराम सखाराम वायाळ,रामदास गोविंद जोरी,गुलाब दत्तात्रय करंडे,अशोक अनंता जोरी ,रामदास बाबुराव रोडे,देविदास नामदेव भाटे,किशोर कचरदास करंडे,दत्तात्रय दामाजी करंडे,कान्हु संतु करंडे,राहुल मल्हारी भुरके,बजरंग सिताराम करंडे,विनायक रघुनाथ करंडे,बारकु बाबुराव करंडे ,प्रमोद वाळुंज ,बबनराव वाळुंज ,ज्ञानेश्वर काकडे,नाथा येसु करंडे या व इतर शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

प्रत्येक शेतकऱ्याचे किमान दहा ते पंधरा हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या कांद्याला व तरकारी पिकांना बाजार भाव नाही अशा परिस्थितीतही शेतकरी शेतात राबवत असतो. त्याचप्रमाणे सध्या मोठ्या प्रमाणावर ऊन पडत असल्याने शेतीत उभी असणारी पिके ही केबल चोरीमुळे जळून जाणार आहेत. त्यामुळे एकंदरीत दोन्ही बाजूने शेतकरी वर्ग अडचणीत आल्याने आता करायचे काय हा प्रश्न शेतकरी विचारात आहेत.

पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदर चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
याआधी या ठिकाणावरून पाच वेळा केबल चोरीच्या घटना घडल्या असल्याने वारंवार जाणार्या केबल चोरीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या