मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, निरगुडसर, लाखनगाव, धामणी, लोणी, वडगावपीर आदी गावांमध्ये महावितरण कंपनीकडून विजेचे भारनियमन अनिश्चित स्वरूपात सुरू असल्याने वीज ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात अचानक सकाळच्या वेळी किंवा सायंकाळी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भारनियमन झाल्यानंतर वीजपुरवठा नेमका किती वेळाने सुरळीत होईल, याबाबत ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्व आंबेगावातील गावांचा परिसर बिबट्या प्रवण असल्याने रात्रीच्या वेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच वीज नसल्याने गृहीणी, शालेय विद्यार्थी, दुग्ध उत्पादक शेतकरी यांच्यासह विविध घटकांना दैनंदिन कामकाजात अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.
दूध व्यवसायावरही या भारनियमनाचा परिणाम होत असून, सकाळ-सायंकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित झाल्याने दूध काढणे, पाणीपुरवठा तसेच इतर कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
महावितरण कंपनीला भारनियमन करू नये भारनियमन करायचे असल्यास त्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे आणि ग्राहकांना पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते बाळशिराम वाळुंज यांनी केली आहे





