मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील अनिल ज्ञानेश्वर भांड यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पोंदेवाडी गावचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर, आनंदा पोंदे, चंद्रकांत विरकर, दूध डेअरीचे चेअरमन आनंदा भांड, सचिन साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अंकिता वाळुंज म्हणाल्या की, ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या प्रयत्न, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर शासकीय सेवेत दाखल होतात, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. शासकीय सेवेत यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देताना अपयशाने खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवावेत. सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर एक दिवस निश्चितच यश प्राप्त करता येते, असे त्यांनी सांगितले.
अनिल भांड यांनी सर्वसामान्य कुटुंबातून येत मेहनत व चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात मिळविलेल्या यशाबद्दल जारकरवाडी व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





