मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात लाखणगाव, काठापूर, पोंदेवाडी, जारकरवाडी, पारगाव कारखाना परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, गायगोठे, घरे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही नागरिक जखमी झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाखणगाव व पोंदेवाडी येथील पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी देवदत्त निकम यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यात पंचायत समिती सदस्य श्वेता ढोबळे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाबळे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.





